इंदापूर/भिगवण : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या भिगवण येथील तरुणीच्या अपहरण प्रकरणाला आज अखेर पूर्णविराम मिळाला आहे. बारामती न्यायालयाने आज या प्रकरणी ऐतिहासिक निर्णय दिला असून, पीडित तरुणीने आईसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर तिला आई आणि मामाच्या स्वाधीन करण्याचे आदेश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी भिगवण येथून एका तरुणीचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेनंतर संबंधित तरुणीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून, आपण स्वमर्जीने पळून गेल्याचा दावा केला होता. मात्र, या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण पुणे जिल्ह्यात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने आक्रमक पवित्रा घेत रस्ता रोको केला. इंदापूर, बारामती आणि दौंड तालुके कडकडीत बंद ठेवून या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला होता.
आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांनी भिगवण येथे जाहीर मोर्चा काढत पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. "मुलगी आईकडे सुखरूप पोहचेपर्यंत हा लढा सुरूच राहील," असा शब्द त्यांनी कुटुंबाला दिला होता.
संबंधित तरुणी बारामती पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाली तेव्हा तिने सुरुवातीला मुलासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. पोलिसांनी तिला कायदेशीर प्रक्रियेसाठी बारामती न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिची सुरक्षितता लक्षात घेऊन तिला तात्पुरते पुणे येथील सुधारगृहात पाठवले होते.
आज पुन्हा एकदा या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायाधीशांनी तरुणीशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा चर्चा केली आणि तिची सविस्तर जबानी नोंदवून घेतली. यावेळी तरुणीने आपली भूमिका बदलत "मला माझ्या आईकडे आणि मामाकडे जायचे आहे," असा स्पष्ट शब्द दिला.
मुलीची मानसिक स्थिती आणि तिची प्रत्यक्ष इच्छा लक्षात घेऊन न्यायालयाने तिला तातडीने आई-मामाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. या निकालामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चिंतेत असलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाच्या या निर्णयाचे भिगवण परिसरात स्वागत होत आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांनी दिलेला लढा, हिंदू समाजाचा एकोपा आणि आईची ओढ यामुळेच हा निकाल सकारात्मक लागल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Post a Comment